Friday 28 January 2022

केदारेश्वर मंदिर ,धर्मापुरी

 

             आंबेजोगाई शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर धर्मापुरी हे एक लहानसे गाव आहे. या गावाच्या लगतच असलेल्या एका शेतामध्ये चालुक्यकालीन "केदारेश्वर मंदिर" आहे ,तसेच या गावाच्या शिवारात एका भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष सुद्धा दिसून येतात. मंदिराच्या मुखमंडपाचा भाग अत्यंत भग्न अवस्थेत होता, मात्र सध्या मंदिराचे संवर्धन चांगल्यारितीने झाले आहे. या मंदिराचे विधान हे होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरा सारखेच आहे ,म्हणजे मुख्य गर्भगृह आणि तीन प्रवेशद्वार अर्थातच खुले सभामंडप आहे मात्र या दोन्ही मंदिरांच्या बाह्य भागात विसंगती आढळतें.


 
प्रस्तुत केदारेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून, मूळच्या विधाना प्रमाणे अधिष्ठानावर आहे .त्यावर वेदीबंद, जंघाभाग आणि कपोत अशी एकंदरीत रचना दिसून येते. उत्तर-दक्षिण बाजूला असलेल्या अर्ध मंडपाची मोजमापे 9 फूट × 9 फूट अशी आहेत. रंग शिळेभोवती असलेले चार स्तंभ आणि अन्य आठ स्तंभांनी मिळून मंदिराचे वितान तोलले आहे. सभामंडपातील जमिनी सपाट आणि गुळगुळीत असून विताना चा केवळ मध्य भाग कोरीव आहे ,बाकीच्या भागावर कोरीव काम दिसत नाही. सभामंडपामध्ये दोन देवकोष्ठे आहेत मात्र सध्या ते रिक्त आहेत.


अंतराळ लहान आकाराचे असून, 10 फूट × 10 फूट अशा मोजमापाचे आहे.येथूनच गर्भग्रहाची सुंदर द्वार शाखा नजरेत भरते परंतु द्वार शाखेस भडक तैलरंग लावलेला असल्याने मूळ सौंदर्यास बाधा निर्माण झाली आहे. येथील प्रवेशद्वाराला पाच शाखा असून ललाट लिंबावर गणेशाचे अंकन आहे तर प्रवेशद्वाराच्या तळाशी किर्तीमुख कोरलेले आहे.

गर्भगृह चौरसाकृती असून  10 फूट × 10 फूट अशा मोजमापाची असून ,मध्यभागी शिवलिंग आहे .

मंदिराच्या बाह्यांगाचा विचार केला असता समोरील बाजूस भिंतीवर लघु शिल्पे असुन, बाह्यांगावर एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यात शैव, वैष्णव ,आणि शाक्त पंथाचे शिल्पं दिसून येतात.विष्णुचा नरसिंह अवतार, वामन अवतार ,वराह अवतार,ब्रह्मा, काली, शालभंजिका, पत्रलेखा,दर्पणा,रती मदन इ.चा समावेश आहे. बाह्य भिंतींवर एकूण तीन देवकोष्टक असून त्यात केशव, नरसिंह व वासुदेवाची मूर्ती आहे.

या मंदिरावरील पत्रलेखिका विशेष आहे, आवर्जुन पहावी अशी...कलेचे, रसिकतेचे, साधनेचे ते एक ज्वलंत उदाहरण च आहे. पत्र लेखिकेची वेशभूषा, केशभूषा, अलंकार, चेहऱ्यावरील भाव, हातात पकडलेली लेखणी,तो पत्र लिहिणारा हात, तसेच लिहिताना लेखणी वर पडलेल्या दाबामुळे बोटांवरील त्वचेची जी स्थिती होते अगदी त्याचेही अंकन कलाकारांने केले आहे, हे सारं काही नजरेतून मनात भरावं असं विलक्षण आहे. खरेच कलेची  साधना याहून अन्य नाही.



Wednesday 12 January 2022

धनुष्यबाण..

"धनुष्यबाण" हे एक महत्त्वपूर्ण आयुध आहे ,जे पुर्वी शिकारीसाठी तसेच युद्धात किंवा स्पर्धेत संधान साधावयास वापरले जायचे.   धनुष्य हे वेदकालीन आर्यांचे मुख्य शस्त्र होते.पित्याचे धनुष्यबाण हे वारसाहक्काने  पुत्राकडे येत असतं. ऋग्वेदातील धनुष्य लाकडाचे असून त्याची दोरी स्नायूची होती,तर महाभारतात "कार्मुक" या लाकडाचे धनुष्य बनवीत असतं. महाभारतातील धनुष्य रंगवलेली असुन त्यावर सुवर्णा कृती पुष्पे, व रत्ने जडवलेली असत. धनुष्य ही वापरणाऱ्यांच्या उंचीच्या व शक्तीच्या मानाने लहान मोठी असतात सामान्य: त्याची लांबी तालमात्र असावी असे महाभारतात सांगितले आहे, याहून मोठी धनुष्य शक्तीच्या किंवा निशाणा च्या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असतं.


कौटिल्याने धनुष्याचे कोदण्ड, द्रुण,धनु व कार्मुक हे प्रकार दिलेले असून ते अनुक्रमे ताल, बांबू, दारू व शृंग यांपासून बनविलेले असतात असे नमूद केलेले आहे.  

धनुष्यासाठी 'शिंग व लोखंड' यांचा संयुक्त उपयोग करावा असे अग्नीपुराणात सांगितलेले आहे, तरी हिरोडोटस च्या काळापर्यंत मुख्यता बांबूची धनुष्य वापरात होती.कालांतराने धातूंची निर्मिती वाढली व त्याचा उपयोग अस्त्रांसाठी होऊ लागला.

"शिज्जिनी" म्हणजे धनुष्याची दोरी. वेदकाळामध्ये ही दोरी बैलाची कातडे किंवा स्नायू यांच्यापासुन बनवली जात असे. मूर्व, तृण, शण, बांबू ची साल व स्नायू यांपासून धनुष्याची शिज्जिनी करावी असे कौटिल्याने सांगितले आहे.

शिज्जिनी च्या प्रत्येक टोकाला फांस असे, त्यापैकी एक फांस धनुष्याच्या वरच्या टोकाशी असलेल्या खाचेत नेहमी गुंतवलेला असे. धनुष्य वापरण्याच्या वेळीच दूसरा फांस खालच्या खांचेत बसविण्यात येत असे नाही तर धनुष्याच्या कमानीची शक्ती नष्ट होत असते.

धनुष्य वापरण्याच्या वेगवेगळ्या संज्ञा असतात,त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:-
आतन्= धनुष्यावर दोरी चढविणे
प्रतिज्ञा= बाण लावणे
आयम्= धनुष्य वाकवणे
अस्= बाण सोडणे.



बाण जोडून शिज्जिनी ताणून नेम धरण्याला "संधान" असे म्हणतात. धनुष्याचा मध्यभाग व बाणाचे अग्र आणि लक्ष्य ही उघड्या डोळ्यांच्या पातळीत येतील एवढेच धनुष्य उचलून संधान साधावयाचे असते.


ऋग्वेदात व अथर्ववेदांत "आलाक्ता" व "दिग्ध" या विषारी बाणांचा उल्लेख आलेला आहे अशा विषारी बाणांचा वापर धर्मयुद्धा मध्ये करायचा नाही असा एक सक्त नियम होता.

महाभारतातले योद्धे हे धनुष्य उभे धरतात,आणि धनुष्याची दोरी ही कानापर्यंत  ओढतात.
गुडघ्यावर बसून किंवा अंतराळातील संधान साधावयाचे असेल तेव्हा धनुष्य हे आडवे च धरावे लागते.

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...